मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज १९ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ९०.३, रायगड १३४.१, रत्नागिरी ६०.९, सिंधुदुर्ग ९.४, पालघर १२०.९, नाशिक ४०.३, धुळे २५.५, नंदुरबार ३३.४, जळगाव ४.७
अहिल्यानगर ८.७, पुणे २९.३, सोलापूर ०.३, सातारा १७.७, सांगली ५.९, कोल्हापूर १२.१, छत्रपती संभाजीनगर ४.५, जालना २.१, बीड ०.२, धाराशिव ०.२, नांदेड ०.६, परभणी ०.५, हिंगोली ०.८, बुलढाणा ३.१, अकोला ८.६, वाशिम १.७ अमरावती ५.९, यवतमाळ १.२, वर्धा ३.२, नागपूर ०.७, भंडारा ०.३,चंद्रपूर ४.३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी तर सोलापूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक पाळणा तुटून एक व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी व पाताळगंगा नदीने इशारा पातळी पार केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी पार केली असून. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील नारुर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेला आहे. जवळील लोखंडी पूलावरून नागरिकांचे दळणवळण चालू आहे. मौजे कुचंबे ता.संगमेश्वर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने तहसीलदार संगमेश्वर यांच्यामार्फत योग्य कार्यवाही करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.