सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे विश्वस्तांची वारकऱ्यांशी गैरवर्तणूक, सर्वांदेखत आकांडतांडव,व्हिडीओ व्हायरल!

डिजिटल पुणे    21-06-2025 11:31:42

पुणे : आळंदी येथून निघालेल्या संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठा वाद उद्भवला आहे. आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्यावर वारकरी, पत्रकार आणि पोलिसांशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ही घटना पवित्र वातावरणात जिथे सर्व भाविक वारकऱ्यांची सेवाभावी वृत्तीने वारीत सहभाग घेत होते, त्याच ठिकाणी घडल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. मंदिर प्रशासन आणि संबंधित विश्वस्तांविरोधात तातडीने कारवाईची मागणी वारकरी समुदायाकडून केली जात आहे. 

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, निरंजन नाथ यांनी मंदिरात उपस्थित असलेल्या वारकऱ्यांशी उर्मट आणि अवमानकारक बोलणी केली. काही माध्यम प्रतिनिधींना देखील त्यांनी झिडकारल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर पोलीस कर्मचाऱ्यांशीही त्यांनी उद्धट संवाद साधल्याचे बोलले जात आहे. यावेळी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती.घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक माध्यमांवर याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वारकऱ्यांनी या प्रकाराला “धर्माचा आणि सेवाभावाचा अपमान” असे संबोधून निषेध केला आहे.

या घटनेवर एका वारकऱ्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली. त्यांनी म्हटलं, “जेव्हा देवाच्या सेवकांना स्वतःला देवाचा मालक असल्याचा भ्रम निर्माण होतो, तेव्हा ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ उमगतो का?” हा प्रश्न केवळ निरंजन नाथ यांना नव्हे, तर अशा प्रकारे वागणाऱ्या सर्व धर्मप्रमुखांना उद्देशून आहे. 

संत परंपरेचा आधार घेऊन आजही हजारो वारकरी पंढरपूरची वारी करतात. अशा सेवाभावाने सुरू असलेल्या वारीत अशा घटनांमुळे भाविकांच्या मनात नाराजी निर्माण झाली असून, वारकरी संप्रदायाच्या मूल्यांना धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.

मंदिर प्रशासनाकडून अद्याप मौन; कारवाईची मागणी तीव्र :

घटनेनंतर वारकरी संघटनांकडून संबंधित विश्वस्तांविरोधात कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे. अद्याप मंदिर प्रशासनाने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र समाजमाध्यमांवरील दबाव, स्थानिक वारकरी मंडळांची मागणी आणि भाविकांचा संताप लक्षात घेता प्रशासन लवकरच भूमिका स्पष्ट करेल, अशी अपेक्षा आहे. याप्रकरणी वारीचा पवित्र उद्देश आणि वारकऱ्यांची श्रद्धा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी मंडळांचे मत आहे.


 Give Feedback



 जाहिराती