पुणे : राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तापला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केलं आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण आता या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत अलेला असतानाही अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.२१) राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘सरकार शब्द फिरवणार नाही. योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय होईल. कर्जमाफी कधी करायची? या संदर्भात काही नियम आहेत, पद्धती आहे,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते.
शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांच्या आत समिती नेमली जाईल. त्यानंतर या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने नुकतेच प्रहारचे संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिले होते. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले. सरकारच्या या आश्वासनानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केले होते.