नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी लढा द्यावा लागत आहे. मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आले आहेत. ठाकरे बंधू यांनी दोन दशकांनंतर एकत्र येत विजयी सभा घेतली आहे. मात्र यावरुन मुंबईसह महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक आणि परप्रांतीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांविरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी अकलेचे तारे तोडून मराठी माणसांना थेट आव्हान दिले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी अमराठी या मुद्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अशातच, ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली आहे. महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो? असा सवाल त्यांनी उपस्थित करत ठाकरेबंधूना डिवचले आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी आंदोलकांविरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी मराठी माणसांना आपटून आपटून मारु असे देखील म्हटले आहे. निशिकांत दुबे म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये हे काय सांगतात की मराठी बोलले पाहिजे. हे कोणाची भाकर खात आहेत. टाटा, बिर्ला, रिलायन्स आहे हे कोणीही महाराष्ट्रीयन नाहीत. महाराष्ट्रात कोणी सर्वात जास्त टॅक्स भरत का? आमच्या पैशांवर तुम्ही जगत आहात. कोणती इंडस्ट्री तुमच्याकडे आहे? खाणी तरी आहेत का तुमच्याकडे? हे सगळं झारखंड, उडीसा आणि बिहारमध्ये आहे,” अशा शब्दांत निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांना हिणवले आहे.
पुढे ते म्हणाले की, “सगळे प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. तुम्ही फक्त लाठीशाही करत आहात. तुम्ही आमचेच शोषण करत आहात. तुमच्यामध्ये एवढी हिम्मत आहे तर उर्दु भाषिकांना सुद्धा मारा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष्य करत आहेत. तुम्हाला मारायचं असेल तर मग मुंबईतील तामिळी, तेलुगु आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा. स्वत:च्या घरात सगळेच राजे असतात. राज आणि उद्धव ठाकरे यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशात येऊन दाखवावं, तिकडे त्यांना उचलून आपटतील. आम्ही मराठीचा सन्मान करतो पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही असा इशाराही दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिला आहे.
पुढे निशिकांत दुबे म्हणाले की, “मराठी ही आदरणीय भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, पेशवे आणि तात्या टोपे सर्वांचा सन्मान आम्ही करतो. लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले यांचे स्वातंत्र लढ्यामध्ये योगदान दिले आहे. देशाच्या स्वातंत्र लढयामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. मात्र आता मुंबई पालिकेच्या ज्या निवडणूका होत आहेत त्यासाठी हे मुंबईमध्ये सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे करत आहेत त्याहून वाईट काही काम नसेल. मी त्याचा विरोध करतो. जर त्यांच्यामध्ये हिम्मत आहे तर ते त्यांनी शेजारीच असणाऱ्या माहिम भागामध्ये जाऊन माहिमच्या दर्गासमोर कोणत्याही हिंदी किंवा उर्दु भाषिक माणसाला मारुन दाखवा. मग मी खरंच ते दोघं बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहे हे मान्य करेल,” अशा शब्दांत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिले आहे.