मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची थेट ऑफर दिली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात फडणवीस यांनी हे वक्तव्य करून राजकीय चर्चेला नवीन दिशा दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, "उद्धवजी, 2029 पर्यंत आमचं तिकडे जायचं काही उरलेलं नाही. पण तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू." त्यांनी मिश्किलपणे ही ऑफर दिल्याचं दिसत असलं तरी या वक्तव्यातून दिल्लीतून आलेल्या काही हालचालींचे संकेत मिळत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
यावेळी फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्याबाबतही भाष्य करताना, ते कुठेही असले तरी त्यांचा आत्मा हिंदुत्ववादी आहे आणि ते हा विचार सोडणार नाहीत, असं स्पष्ट केलं. पुढील विरोधी पक्षनेता कोण होणार, याचा निर्णयही सभापती व अध्यक्ष ठरवतील, असं ते म्हणाले.या वक्तव्याच्या गांभीर्यावर सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. फडणवीस यांनी हे विधान मिश्किलपणे केलं की रणनीतीचा भाग म्हणून, हे अजून स्पष्ट नाही. मात्र उद्धव ठाकरे यांची या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.२०१९ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून वेगळी वाट धरली होती. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये संबंध ताणले गेले. मात्र आता फडणवीस यांनी दिलेल्या या ऑफरमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या हालचाली घडू शकतात.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. भोंग्यानविरोधात त्यांनी अनेक निवेदनं दिली. ते कट्टर सावरकरवादी आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अंबादास दानवे हे मूळचे भाजपच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारे आणि कट्टर सावरकरवादी कार्यकर्ते म्हणजे दानवे. पण जागावाटपात विधानपरिषदेची जागा शिवसेनेला गेली. मग दानवेंना शिवसेनेत जावं लागलं."
फडणवीसांच्या भाषणाचा हाच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता आम्हाला दिला याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानतो. मात्र त्यांनी माझ्याकडून घेतलेल्या नेत्यांबद्दल मुख्यमंत्री माझे आभार मानू शकतील की नाही याबद्दल शंका आहे."