अमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा" या मुख्य मागणीसह राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. विदर्भात काढलेल्या पदयात्रेदरम्यान सरकारच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी लढ्याची दिशा ठरवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली असून, राज्यभरात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी यापूर्वी ८ दिवस अन्नत्याग उपोषण केलं होते. यानंतर विदर्भात पदयात्रा काढली. त्याचवेळी त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवली. आता सरकारला आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्यात आली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू कडू यांच्याकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचे आक्रमक रूप बघायला मिळालं. ठिकठिकाणी टायर जाळण्यात आले. सरकार विरोधीच घोषणाबाजी करण्यात आली. शेतमजूर, दिव्यांग, शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ अशा सर्वच समाजातील लोकांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच अनेक आमदार- खासदार यांच्यासह काही राजकीय पक्षांनीही बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला.
गांधीगिरी संपली आता भगतसिंगगिरी सुरू
परतवाडा येथील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू यांनी म्हंटल, कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर येत आहेत, तर मच्छीमार, दिव्यांग, मेंढपाळ आदी घटकांच्या समस्याही गंभीर आहेत. मात्र, सरकारकडून सातत्याने दिशाभूल केली जात आहे. सरकारलाच राज्यात अशांतता हवी आहे. त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा होत नाही. सरकारने जी समिती नेमली, त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहिती नाही. त्यामुळे आता आमची गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली आहे. आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरणार नाही, आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला.