बारामती : बारामतीतील महात्मा फुले चौकात काल रविवारी डंपर आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वडील आणि दोन बहिणीचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकी पूर्ण डंपरच्या चाकाखाली सापडली. त्यामध्ये दुचाकी चालक जागीच ठार झाले. तर त्यांच्या दोन मुलींना तातडीने उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्या दोघींचा देखील मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. ओमकार राजेंद्र आचार्य यांच्यासह सई आणि मधुरा अशी या तिघांची नावे.दरम्यान या घटनेचा धक्का सहन न झाल्याने राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही सोमवारी (ता. 28) निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते. अवघ्या २४ तासांत चार जणांच्या निधनामुळे बारामती शहरात शोककळा पसरली आहे.
रविवारी राजेंद्र आचार्य हे १० वर्षीय सई आणि ४ वर्षीय मधुरा या दोन मुलींना घेऊन घरातील सामान आणण्यासाठी दुचाकीवरून बाहेर पडले होते. बारामती शहरातील महात्मा फुले चौकात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला मालवाहू डंपरने धडक दिली. यावेळी मागच्या चाकाखाली आल्याने ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन मुलींना स्थानिक नागरिकांनी दवाखान्यात नेत असतानाच त्या दोन मुलींचा रस्त्यातच मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताचे दृश्य पाहिल्यानंतर, अनेकांचे डोळे पाणावले. या भीषण अपघातात तिघांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण बारामती शहर हळहळलं होतं. आचार्य कुटुंब मूळचं इंदापूर तालुक्यातल्या सनसर गावचं आहे.
दरम्यान या तिघांच्या मृत्यूचं दुःख कमी होत नाही तोवर आचार्य कुटुंबीयांवर आणखी मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. ओमकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे देखील आज सकाळी निधन झालं. राजेंद्र आचार्य सेवानिवृत्त शिक्षक होते. ७० वर्ष वय असलेल्या राजेंद्र यांना शुगर होती. बारामतीच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. आजारी असलेल्या वडिलांना फळ आणण्यासाठीच ओमकार मुलीसह घराबाहेर पडला होता. आणि दुर्दैवी अपघातात तिघांचाही मृत्यू झाला होता. मुलांच्या आणि नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आज सकाळी राजेंद्र आचार्य यांचे देखील निधन झाले. २४ तासात एकाच कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने आचार्य परिवारासह संपूर्ण बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही संपूर्ण घटना बारामतीतील नागरिकांच्या काळजात खोलवर घाव करणारी ठरली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा दुर्दैवी प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.