पुणे: स्थानिक देशी वनस्पतींच्या संवर्धनासाठी कार्यरत ‘जीविधा’ संस्थेच्या वतीने आयोजित हिरवाई महोत्सव २०२५ ला आज इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर, पुणे येथे उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवाचे उद्घाटन राजीव पंडित आणि वृंदा पंडित यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर पर्यावरण अभ्यासक ईशान पहाडे यांचे 'वनस्पती आणि कीटक यातील संबंध' या विषयावर सखोल व्याख्यान झाले. परागीभवन, बीजप्रसार आणि जैविक परस्परसंबंध या विषयांवर त्यांनी रोचक उदाहरणांमधून माहिती दिली.महोत्सवाचा उद्देश नागरिकांमध्ये स्थानिक वनस्पतींबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या लागवडीत जनसहभाग वाढवणे हा आहे.‘परस्पर संवाद’ ही यंदाची संकल्पना असून, वनस्पती आणि प्राणी-जगतातील जैव सहजीवन उलगडणाऱ्या व्याख्यानांचा त्यात समावेश आहे.
ईशान पहाडे म्हणाले,'खूप पूर्वी सर्व कीटक, फुलपाखरे आकाराने मोठे होते. नंतर त्यात बदल होत गेला. परागीकरणात कीटकांचा उपयोग होतो.किटकांचा प्रवास, स्थलांतर याबददल रोचक माहिती त्यांनी दिली. जंगलातील मृतदेहाचा फॉरेन्सिक तपास करताना या किटकांचा कसा उपयोग होतो, हेही त्यांनी सांगितले. मुंग्यांची माहितीदेखील त्यांनी दिली.मधमाशा वर्षातून २० किलो पर्यंत परागकण वाहून नेतात.परागीभवनासाठी ७५ टक्के वनस्पती मधमाशांवर अवलंबून असतात. प्रोपालिस या चिकट पदार्थाची निर्मिती मधमाशा करतात. त्यामुळे उंच इमारतींच्या भिंतींनाही पोळी चिकटविण्यात त्या यशस्वी होतात. मधमाशा असतील तर चाळीस टक्क्याने कृषी उत्पादन वाढते, मधमाशा पालनात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शहरीकरणात शंभरपैकी ४ मुलेच मातीत काम करतात, बाकीच्यांना मातीत हातही घालण्याची संधी मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले.
फुलपाखराला हलक्या हाताने,इजा होणार नाही अशा बेताने जवळ घेऊन सुगंध घेतला तर वेगवेगळे अफलातून सुगंध अनुभवता येतात, असा अनुभव देखील पहाडे यांनी सांगितला.जैववैविध्यात कीटकांचे अस्तित्व महत्वाचे आहे,कीटकनाशके शेतीत वापरल्याने कीटक नष्ट होत असल्याने काळजी घेतली पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.
३१ जुलै गुरुवार रोजी 'वनस्पती आणि पक्षी-सस्तनप्राणी यांच्यातील संबंध' या विषयावर डॉ. अंकुर पटवर्धन हे मार्गदर्शन करणार आहेत.१ ऑगस्ट शुक्रवार रोजी 'वनस्पतींचा रासायनिक संवाद' या विषयावर आयसर पुणेचे संशोधक डॉ. सागर पंडित आणि वनस्पतीतज्ज्ञ डॉ. महेश शिंदीकर यांच्यात संवाद होणार आहे
या सत्रांतून वनस्पती आणि प्राणी यांच्यातील परस्परावलंबन, जैवसाखळीतील योगदान, व पर्यावरण संतुलन यांचा वैज्ञानिक व अनुभवाधिष्ठित मागोवा घेतला जाणार आहेसर्व कार्यक्रम संध्याकाळी ६.३० ते ८.०० दरम्यान होत आहेत आणि ते सर्वांसाठी खुले व विनामूल्य आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे