सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
  • विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
 विश्लेषण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात स्वच्छता अभियानाची सुरुवात

डिजिटल पुणे    16-09-2025 10:56:51

मुंबई  :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात येणार आहे. कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी एकत्र येणार असून, तब्बल ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे. या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

या अभियानाबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “विकसित भारताचा संकल्प साकार करण्यातील एक महत्वाचा टप्पा स्वच्छ भारत अभियान हा आहे. भारत स्वच्छ करण्याचा निर्धार पंतप्रधानांनी केला असून, त्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत हा उपक्रम सुरु करत आहोत. स्वच्छता, आरोग्य या विषयांबाबत आजही जागृतीची गरज आहे आणि ती गरज या अभियानाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारताचा निर्धार पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतातील पहिली संत गाडगे बाबा स्वच्छ भारत अकादमी महाराष्ट्रात सुरु करण्यात आली असून, याद्वारे हजारो तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळत आहे. स्वच्छता आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे हे आपण जाणतोच, पण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी गरज आहे ती जनजागृतीची आणि कुशल मनुष्यबळाची. या दोन्ही गोष्टींसाठी महाराष्ट्राचा कौशल्य विकास विभाग तत्परतेने पुढाकार घेत राहील, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती