पुणे : इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने सलोखा सायकल यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संस्थापक आणि समाजसेवक असलम इसाक बागवान यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पुणे (महाराष्ट्र) येथून सुरू होऊन डेरा बाबा नानक (पंजाब) येथे पूर्ण झाली. सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा देशभर मानवता, एकता आणि करुणेचा प्रभावी संदेश घेऊन गेली.१० सप्टेंबर २०२५ ला यात्रेला सुरवात झाली. १५ ऑक्टोबर रोजी ११ वाजता असलम बागवान पुणे स्टेशन येथे परत येत आहेत.या यात्रेचा मुख्य उद्देश पंजाबमधील पूरग्रस्त नागरिकांपर्यंत मदत आणि सहकार्य पोहोचवणे हा होता. सेवा, सहाय्य आणि सलोखा संदेश समाजात रुजवणे हे या उपक्रमामागील ध्येय होते.
डेरा बाबा नानक आणि परिसरातील पूरग्रस्त भागात विविध सामाजिक कार्ये आणि मदत उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाज्या, पिण्याचे पाणी आणि औषधे पुरविण्यात आली. जवळपास छत्तीस कुटुंबांना घर बांधकामासाठी प्रत्यक्ष सहाय्य दिले गेले. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने विनामूल्य औषध वितरण आणि आरोग्य जनजागृती करण्यात आली. पूरानंतर पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षणासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
यात्रेदरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वृक्षारोपण करून हरित भारत आणि मानवता प्रथम या अभियानांना चालना देण्यात आली. युवकांना सामाजिक ऐक्य आणि हवामान संरक्षणासाठी प्रेरित करण्यात आले.
पंजाबमधील अनेक स्वयंसेवक, नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी या यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला. स्थानिक रहिवाशांनी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आणि सेवा कार्यात सहभाग घेतला.