मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या मध्ये मुंबई व छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था आणि दोन वसतिगृहांचे अद्ययावतीकरण, जीर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी पुढील पाच वर्षात, दरवर्षी १०० कोटी याप्रमाणे ५०० कोटी या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार नऊ महाविद्यालये आणि दोन वसतिगृहे यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे सोसायटीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल. तसेच या निर्णयामुळे ऐतिहासिक शैक्षणिक संस्थांचे जतन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता वाढणार आहे.
या योजनेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या नऊ शिक्षण संस्था यामधील मुंबईतील सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सिद्धार्थ नाईट हायस्कूल, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, सिद्धार्थ विधी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा आणि छत्रपती संभाजीनगरमधील मिलिंद कला महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालय, मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल, मिलिंद प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल) आणि छत्रपती संभाजीनगर येथील दोन वसतिगृहे (अजिंठा बॉईज होस्टेल आणि प्रज्ञा मुलींचे वसतिगृह) यांचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे.