मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील १९५०-६० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे संध्या शांताराम. त्यांनी आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. नुकतेच वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. या गुणी अभिनेत्रीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका खास कार्यक्रमाचे आयोजन कालनिर्णय कडून करण्यात आले आहे. कालनिर्णय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्तविद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
हा कार्यक्रम प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील लघु नाट्यगृहात रविवारी, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ पर्यंत होईल. यावेळी व्ही. शांताराम निर्मित दिग्दर्शित आणि विश्राम बेडेकर लिखित ‘अमर भूपाळी’ हा सिनेमा दाखवण्यात येईल. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणे हे संध्या यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत ‘अमर भूपाळी’ या चित्रपटाविषयी भाष्य करतील.हा कार्यक्रम सर्व कला आणि चित्रपट रसिकांसाठी विनामूल्य खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.