मुंबई : वंदे मातरम् हे एक गीत नसून भारतवासीयांसाठी एक मंत्र आहे, ज्यातून प्रत्येक भारतीय एकमेकांशी जोडला गेलेला आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ हे गीत भारताच्या ऐतिहासिक सुवर्णकाळाची, स्वतंत्र्यासाठी लढलेल्या माणसांच्या बलिदानाची आणि देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची भावना व्यक्त करते, या शब्दात विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी विचार व्यक्त केले.मुंबई विधानभवनच्या सेंट्रल हॉलमध्ये ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, विधिमंडळाच्या सचिव मेघना तळेकर, सचिव डॉ.विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठे, विधानपरिषद सभापतींचे सचिव पंडीत खेडकर, विधानसभा अध्यक्षांचे सचिव सुनील वाणी तसेच विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष ॲड नार्वेकर म्हणाले की, वंदे मातरम् या गीताचा १५० वर्षांचा इतिहास पाहताना, आपल्याला त्याच्या शौर्य, देशभक्ती आणि समर्पणाचा विचार करावा लागतो. रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा सादर केले आणि त्यानंतर ते प्रत्येक कार्यक्रमात आणि समारंभात राष्ट्रीय गीत म्हणून गायले जाते. हे गीत आज केवळ देशाच्या कानाकोपऱ्यात नाही, तर संपूर्ण जगात ऐकायला मिळते.”
अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी सांगितले की, “जी व्यक्ती भारताची अस्मिता, संस्कृती आणि इतिहास प्रेमाने स्वीकारतो, तो प्रत्येक वेळेला ‘वंदे मातरम’ गीत गात राहतो. हे गीत आपल्याला देशाच्या एकतेची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते. येणाऱ्या काळात आपण सर्वजण या गीताचे अभिमानाने गायन करत राहू, आणि आपल्या राष्ट्राच्या महान परंपरेला पुढे नेण्याचे कार्य करू, असे ते म्हणाले.