मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. काही ठिकाणी नगरपरिषदेच्या आणि नगरपंतायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ठिकाणी रंगतदार लढती होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणच्या नगरपरिषदेत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केलीय. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? असा सवाल रोहित पवारांनी केलाय.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रणसंग्रामाला सुरुवात झाली असताना काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे, अशा अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवारच बिनविरोध निवडून येत असल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी या पार्श्वभूमीवर भाजपवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री जयकुमार रावल जी यांच्या मातोश्री सौ नयनकुवर ताई रावल यांची दोंडाइचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? हा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांचे आरोप
“बिनविरोध निवडणुका होणे चांगली गोष्ट आहे. पण भाजपच्याच जागा बिनविरोध का? हे योगायोग म्हणायचे का कुठली ‘यंत्रणा’?” असा थेट सवाल करत त्यांनी भाजपवर साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा आरोप केला.
भाजपच्या ‘घराणेशाही’वर रोहित पवारांचा टोला
पवारांनी नामोल्लेखासह भाजपच्या अनेक वरच्या स्तरावरील नेत्यांच्या कुटुंबीयांच्या बिनविरोध निवडींची आठवण करून दिली—
चिखलदरा नगरपरिषद : प्रल्हाद कलोती (देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक)
जामनेर नगरपरिषद : साधना महाजन (मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी)
दोंडाइचा नगरपंचायत : नयनकुवर रावल (मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री)या यादीचा संदर्भ देत रोहित पवार म्हणाले,“घराणेशाहीचा आरोप करत फिरणाऱ्या भाजपनेच ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवून पक्षातली लोकशाही किती मजबूत आहे हे दाखवून दिलं.”
भाजपमधील निष्ठावंतांची उपेक्षा?
पुढे पवार म्हणाले,“वर्षानुवर्षे भाजपासाठी काम करणाऱ्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
राज्याचे राजकीय वातावरण तापले
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. काही ठिकाणी महायुतीमध्येच लढती; तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे पक्षही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामध्ये भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने सत्ता पक्षाविरोधात प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत.