मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली असून यामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, सर्वोत्कृष्ट ॲडफिल्म (इंग्रजी) पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्याने महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे.डेहराडून (उत्तराखंड) येथील हॉटेल एमराल्डमध्ये १३ ते १५ डिसेंबरला होणाऱ्या ४७ व्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवाच्या उदघाटन समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महापारेषणच्या जनसंपर्क विभागाची विविध पुरस्कारासाठी निवड करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत व बहिर्गत संपर्कासाठी राबविलेले उपक्रम, महापारेषण समाचार या गृहमासिकातील डिजिटल बदल, क्यू-आर कोड तसेच इतर डिजिटल माध्यमांचा सकारात्मक पध्दतीने वापर, नागरिकांनी उच्च दाब वीजवाहिनीची काळजी कशी घ्यावी, सेवा पंधरवड्यात राबविलेले विविध सामाजिक उपक्रम, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी, ड्रोनच्या सहाय्याने दुर्गम भागात अखंड वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी हे फिल्ममध्ये अॅनिमेशनचा वापर करून दाखविले आहे. या फिल्मची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
तसेच महापारेषणचे व्हॉटसअप बुलेटिन, ऑडिओ-व्हिज्युअल्स बुलेटिन, व्हॉटसअप चॅनेल, समाजमाध्यमांचा सकारात्मक पद्धतीने जनसंपर्कासाठी वापर करत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचवल्या आहेत. ऊर्जा विभागाने केलेली सकारात्मक कामगिरी, पत्रकारिता व जनसंपर्क विभागाच्या विद्यार्थ्यांशी वार्तालाप, विविध प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात महापारेषणची भूमिका विशद करण्यात आली आहे.
महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने क्यू-आर कोडच्या माध्यमातून नोकरभरतीच्या जाहिराती डिजिटल स्वरूपात केल्या. डिजिटल ई-न्यूजलेटर फ्लिपबुकच्या स्वरूपात मांडले. जनसंपर्क क्षेत्रात १४ राष्ट्रीय पुरस्कार व एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी महापारेषण ही महाराष्ट्रातील पहिली शासकीय कंपनी ठरली आहे.
नवकल्पना व प्रभावी जनसंपर्काचा राष्ट्रीय सन्मान
“पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाकडून महापारेषणला एकाच वेळी तीन राष्ट्रीय पारितोषिके मिळणे, ही आमच्या जनसंपर्क विभागाच्या नवकल्पनाशील कार्यपद्धतीची आणि टीमवर्कची दखल आहे. डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर, पारदर्शकता आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे महापारेषणने राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनसंपर्क विभागाचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.”