मुंबई: आरोग्य विज्ञानासाठी जैवतंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरत असून औषध क्षेत्रातील अशा नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासासाठी (लाईफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर) सुविधायुक्त भव्य केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही केली जाईल. असे इनोवेशन पार्क ही काळाची गरज असून याच्या उभारणीतून महाराष्ट्र नावीन्यपूर्ण औषध निर्मिती क्षेत्रात आघाडीवर राहील, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन विभागातील सहआयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहआयुक्त (औषधे) दा रा गहाणे, गिरीश हुकरे, व्ही. टी.जाधव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री झिरवाळ म्हणाले, देशातील गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी संशोधन केंद्र उभी राहत असून औषधांसंदर्भात जैविक व रासायनिक संशोधनासाठी फॉर्म्युलेशन लॅबची सार्वजनिक–खासगी भागीदारीतून देखील उभारणी केली जात आहे. या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट औषधनिर्माण (Pharma), बायोटेक, मेडिकल उपकरणे, डायग्नोस्टिक्स आणि डिजिटल हेल्थ क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आधुनिक सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन तसेच निधी उपलब्ध करुन देणे असणार आहे.
यातून राज्यातील औषध निर्मिती उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढ होईल, स्टार्टअप्सना मार्गदर्शन, प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील. रोजगार निर्मिती होईल. जागतिक दर्जाच्या औषधे उत्पादनांसाठी परिपूर्ण संशोधन संस्था म्हणून ही संस्था काम करेल. असेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.बैठकीत अन्न सुरक्षा, गुण नियंत्रण व दक्षता शाखेचे अधिकारी उपस्थित होते. या इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरमुळे राज्यातील आरोग्य, औषधनिर्मिती व बायोटेक क्षेत्रातील नाविन्याचा जागतिक केंद्रबिंदू बनण्यास मोठी गती मिळेल.यातून नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.