सोलापूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या छळाला आणि पैशाच्या मागणीला कंटाळून बार्शीत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रकाश बाविस्कर असे या ग्रामसेवकाचे नाव असून, उपचारादरम्यान 26 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची ठाम भूमिका घेतली आहे.बार्शी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला असून, गुन्हा नोंदविला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा कुटुंबीयांचा निर्धार आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.काही काळ बार्शी ग्रामीण रुग्णालयात चांगलाच तणाव झाल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही, तुम्ही रितसर जबाब नोंदवा, असे येथील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी म्हटले. मात्र, कुटुंबीय गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
काय आहे प्रकरण?
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ अधिकारी बाविस्कर यांना विविध कारणांनी त्रास देत होते तसेच ‘दप्तर तपासणी’च्या नावाखाली पैशाची मागणीही करत होते. सातत्याने हा मानसिक छळ वाढत गेल्याने 19 नोव्हेंबर रोजी बाविस्कर यांनी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने उपचार सुरू होते, मात्र अखेर त्यांनी प्राण सोडले.सर्व कुटुंबीय ठिय्या मांडून बसले आहेत. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, पण बाविस्कर कुटुंबीयांनी मात्र आधी गुन्हा दाखल करा, असा पवित्रा घेतला आहे. प्रकाश बाविस्कर हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी त्यांना या ना त्या कारणावरून सतत छळत होते. काही दिवसापूर्वी त्यांना दप्तर तपासणी करायची आहे, असे म्हणत त्यांच्याकडे पैशाचीही मागणी करण्यात आल्याचे आरोप कुटुंबीयांनी केले. सतत हे अधिकारी पैसे मागत असल्याचेही कुटुंबियांनी सांगितले. या सगळ्या जाचाला कंटाळून 19 नोव्हेंबर रोजी प्रकाश बाविस्कर यांनी आपल्या राहत्या घरी गळास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, घरात त्यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या खोलीत खुर्ची पडल्याचा आवाज आला आणि त्यांच्या पत्नी खोलीकडे धावल्या. त्यांनी धावपळ करुन लगेचच त्यांना रूग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी उपचार घेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता बाविस्कर कुटुंबीयांनी या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोलीस काय म्हणतात?
घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी, “सध्या गुन्हा दाखल करता येणार नाही, तुम्ही रितसर जबाब नोंदवा,” असे सांगितल्याने कुटुंबीय भडकले आहेत. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा कायम ठेवत आहेत.
रुग्णालयात ठिय्या, वातावरण तणावपूर्ण
संपूर्ण कुटुंब मृतदेहाजवळ ठिय्या देऊन बसले आहे. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरीही कुटुंबीय आपल्या मागणीवर ठाम आहेत. पोस्टमार्टेमपूर्वी कुटुंबीयांची विचारणा न झाल्याचाही त्यांनी निषेध केला आहे.