पुणे : 'एक कदम गांधी के साथ' या संकल्पनेला उजाळा देणाऱ्या दिल्लीतील ऐतिहासिक पदयात्रेत पुण्याच्या इनक्रेडिबल समाज सेवक ग्रुपचे असलम इसाक बागवान आणि ए एस के ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अहमद समद खान यांनी सहभाग घेतला. राजघाट (वाराणसी) येथून नवी दिल्लीच्या राजघाटापर्यंत निघालेल्या या पदयात्रेचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते रामधीरज यांनी केले.नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर,भारत जोडो अभियानाचे मार्गदर्शक योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत समारोप झाला.
समता, साधेपणा आणि स्वावलंबनाचा संदेश देशभर पोहोचवण्याचा या मोहिमेचा उद्देश होता. गांधीवादी मूल्ये पुन्हा समाजात रुजवण्यासाठी आणि लोकशाहीची खरी ताकद जनतेच्या हातात असल्याची जाणीव करून देण्यासाठी विविध राज्यांतील कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील पुणे शहरातून असलम बागवान आणि अहमद खान हे विशेषतः आमंत्रित पथकासोबत चालत होते. सामाजिक सलोखा, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि अहिंसेचे तत्व यांचा प्रचार करण्यावर त्यांनी भर दिला. हजारो किलोमीटरची ही पायपीट साधना, समर्पण आणि विचारांची परीक्षा ठरली. वाटेत झालेल्या संवादांमध्ये युवकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनीही यात्रेचे स्वागत करून गांधीवादी मूल्यांवर चर्चा घडवून आणली.
यात्रेच्या समारोप कार्यक्रमात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण संरक्षणासाठी लोकचळवळींचे महत्व अधोरेखित केले. भारत जोडो अभियानाचे मार्गदर्शक योगेंद्र यादव यांनीही पायी चालत समाजाशी थेट संवाद साधण्याच्या या प्रयत्नाचे विशेष अभिनंदन केले आणि राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया ही तळागाळातील जनतेच्या सहभागातूनच शक्य असल्याचे सांगितले. या संपूर्ण यात्रेमुळे गांधी विचार पुन्हा एकदा चर्चेत आले असून पुण्यातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग समाजात ऐक्य, प्रेम आणि शांततेचा संदेश पोहोचवणारा ठरला आहे.