मुंबई :- सार्वजनिक आरोग्य विभाग व टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘कॅन्सर मुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प सिद्धिस नेऊया असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागाची पाहणी केली. आधुनिक कॅन्सर उपचार पद्धतीची माहिती घेतली. टाटा मेमोरियल सेंटरचे ऑल इंडिया डायरेक्टर डॉ. सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईचे डायरेक्टर डॉ. सी. एस.प्रमेश, डेप्युटी डायरेक्टर श्रीखंडे, डेप्युटी डायरेक्टर सिद्धनाथ लष्कर, रुग्णालय सुपरिटेन्डन्ट डॉ. विनीत सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, अलीकडच्या काळात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनेही राज्यभर कॅन्सर तपासणी व उपचार मोहीम राबवली जात आहे. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर निर्मूलनासाठीचे चांगले काम सुरु आहे.
राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पॅकेजच्या दरामध्ये वाढ केली असून, अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. त्याचा कॅन्सर रुग्णांनाही फायदा होईल. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांना उपचार पश्चात सेवा द्यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून व टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या तांत्रिक सहकार्याने राज्यात 26 ठिकाणी डे – केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जिल्हास्तरावर त्यामुळे कॅन्सर रुग्णांना सेवा उपलब्ध होईल. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या भेटीत “डे केअर” तांत्रिक सहकार्य व प्रशिक्षण याबाबत चर्चा झाली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समावेश असलेल्या रुग्णालयांनी सेवा अधिक प्रभावी करण्यासंदर्भात काही सूचना असल्यास आरोग्य विभागाच्या अभ्यास गटाला द्याव्यात असे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.