नागपूर : राज्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या २०१९-२० मधील २४६ वरून २०२५-२६ मध्ये ९७ पर्यंत खाली आले आहे. एकाही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालविकास, आरोग्य, आदिवासी विकास या संबंधित विभागांची टीम तयार करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी कुपोषणामुळे बालकांच्या होणाऱ्या मृत्यूसंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय खोपडे, प्रवीण दरेकर, श्रीमती चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला.मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण २०२४ मधील ०.७९ टक्क्यांच्या तुलनेत २०२५ मध्ये ०.४१ इतके कमी झाले आहे. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये देखील कुपोषण मुक्तीला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, स्वस्थ माता, सशक्त बालक जन्माला यावेत यासाठी शासनामार्फत विविध प्रयत्न करण्यात येतात. दुर्गम भागात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जातात. स्वच्छतागृहे चांगली केली जात आहेत. सर्व प्रसूती रुग्णालयातच व्हाव्यात यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. आयसीडीएस मार्फत राज्यात ४२,६०२ गरोदर माता आणि बालकांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. तथापि, राज्यात बालकांचे मृत्यू केवळ कुपोषणामुळे होत नसून त्यासाठी विविध कारणे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.