बार्शी : येथील कवी कालिदास मंडळाच्या माजी अध्यक्षा व ज्येष्ठ लेखिका सुमन चंद्रशेखर यांच्या मायेची पाखर (कादंबरी),परिमळ (काव्यसंग्रह) व आठवणींचा दरवळ (ललित लेखसंग्रह) या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.कवी कालिदास मंडळ व चंद्रशेखर परिवार आयोजित प्रकाशन सोहळा ज्येष्ठ लेखिका डॉ श्रुती वडगबाळकर यांच्या शुभहस्ते ,प्रख्यात वक्त्या डॉ रजनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गोसावी,कवयित्री सुमन चंद्रशेखर, शिवानंद चंद्रशेखर, मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आदर्श मातेची सगळी रूपं मायेची पाखर मध्ये दिसून येतात.वात्सल्याची भावना शब्दशब्दात दिसून येते.माया ही प्रेमापेक्षा श्रेष्ठ असते.प्रेम,माया करण्याची वृत्ती मुळातच असायला हवी याची प्रचिती मायेची पाखर मध्ये येत असून चंद्रशेखर यांच्या साहित्यात ग्रामीण संस्कृतीचं दर्शन होत असल्याचे गौरवोद्गार श्रुती वडगबाळकर यांनी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ रजनी जोशी यांनी चंद्रशेखर यांच्या कविता म्हणजे सकारात्मकतेचा आविष्कार असून त्यांनी पाऊस,निसर्ग,मराठी भाषेचे प्रेम,जिव्हाळा असे अनेक विषय हाताळले असून त्यांची कविता लढायला शिकवते आणि सुखाचं तत्वज्ञान सांगून जात असल्याचे मत व्यक्त केले.दत्ता गोसावी यांनी मनाच्या तळात घर करून बसलेल्या आठवणी सर्वांना आनंदी करतात पण त्या सर्वांना शब्दबद्ध करता येत नाहीत अशाच ऊर्जा देणाऱ्या आठवणी चंद्रशेखर यांनी शब्दबद्ध केल्याचे सांगितले. कवी मुकुंदराज यांनी आपल्या संदेशातून सामान्यतः लेखकाचे लेखन म्हणजे त्याच्या अंतकरणाचा आरसा असतो या पुस्तकातून लेखिकेचे निर्मळ अंतकरण प्रतिबिंबित झाल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात स्वरा चंद्रशेखर हिने स्वागतगीताने केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी ,सूत्रसंचालन सुरभी चंद्रशेखर यांनी तर आभारप्रदर्शन अभिजीत चंद्रशेखर यांनी केले.सौ.हर्षा स्वामी यांनी परिमळ या काव्यसंग्रहातील कवितावाचन केले. श्रीमती पुष्पा स्वामी यांचे संदेश वाचन सौ. गीता चंद्रशेखर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश गव्हाणे,आबासाहेब घावटे,शारदा पानगावकर,अजिंक्यस्वामी,आदिती स्वामी,सौ.वर्षा स्वामी,विश्वनाथ स्वामी,भगवंत कपाळे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी कवयित्री वंदना कुलकर्णी, आरती काळे,लेखक हरिश्चंद्र पाटील यांच्यासह मायबोली मंडळ,म.सा.प,ज्येष्ठ नागरिक संघ, सेवानिवृत्त संघटना,मित्र,मैत्रिणी आदी संस्थांचे पदाधिकारी ,सदस्य व साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.