मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संभाव्य फोडाफोडीला शह देण्यासाठी ठाकरे बंधूंनी मोठी आणि चतुर खेळी आखल्याची माहिती समोर येत आहे. मनसे आणि ठाकरे गटाची युती जाहीर करताना तसेच उमेदवारांची नावं घोषित करताना ‘शेवटच्या क्षणापर्यंत पत्ते न उघडण्याची’ रणनीती आखण्यात आली आहे.यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. दुसरीकडे, भाजपनेही कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी भाजपकडून मनसे आणि ठाकरे गटातील नाराज नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न होऊ शकतात, हा धोका ओळखून ठाकरे बंधूंनी खबरदारी घेतली आहे.
युतीची घोषणा अर्ज भरण्याच्या तोंडावर 23 डिसेंबरपासून मुंबई महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. युती झाल्यास दोन्ही पक्षांतील इच्छुकांपैकी अनेकांना संधी मिळणार नाही. त्यामुळे उमेदवार आधीच जाहीर केल्यास नाराज नेते भाजप किंवा शिंदे गटात जाण्याची शक्यता वाढू शकते. हे टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे 22 किंवा 23 डिसेंबर रोजी भव्य मेळाव्यात राज–उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीची औपचारिक घोषणा केली जाणार असल्याची चर्चा आहे.
फोनवर कळवणार उमेदवारी, थेट ‘एबी फॉर्म’ युतीनंतर जागावाटप ठरल्यावर उमेदवारांची नावं लगेच जाहीर न करता संबंधित उमेदवाराला थेट पक्षाकडून फोन केला जाईल आणि अधिकृत एबी फॉर्म दिला जाईल. नावं शेवटच्या क्षणी जाहीर केल्याने बंडखोरांना दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी किंवा स्वतंत्र उमेदवारीची तयारी करण्यासाठी वेळच मिळणार नाही, अशी ही रणनीती आहे.
जागावाटप जवळपास निश्चित ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी ‘शिवतीर्था’वर राज ठाकरे यांच्याशी युती आणि जागावाटपाबाबत चर्चा केली आहे. मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांतील जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, गुरुवारी उद्धव आणि राज ठाकरे संयुक्तपणे युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.भाजपकडे असलेल्या मजबूत संघटनात्मक यंत्रणेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी आखलेली ही ‘लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी’ मुंबईच्या राजकारणात निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
