सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
  • : माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट निघाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज, अजित पवारांशी तातडीची चर्चा
  • मोठी बातमी : अजित पवार मुंबईत महायुतीतून बाहेर पडणार, आजच मोठा निर्णय घेणार?
  • बंडखोरी रोखण्यासाठी राज–उद्धव ठाकरे यांची ‘लास्ट मिनिट’ स्ट्रॅटेजी; उमेदवारांची नावं शेवटपर्यंत गुलदस्त्यात
  • माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं सांगा...; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना थेट प्रश्न,
  • 'उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील', पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
  • मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद दुसऱ्यांदा धोक्यात, अजित पवारांच्या भेटीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
 जिल्हा

जिल्हापरिषद निवडणुकीआधी कायद्यात मोठा बदल, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 सर्वात मोठे निर्णय!

डिजिटल पुणे    17-12-2025 17:45:19

मुंबई : सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होईल. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. यावेली मुंबई महापालिकेची निवडणूक ही इतर महापालिकांच्या निवडणुकीसोबतच होणार आहे. असे असतानाच आता राज्य सरकारने निवडणूक अधिनियम 1961 या कायद्यात मोठी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यात सुधारणेचा अध्यादेश काढला जाणार असून या अध्यादेशाद्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहील, अशी तरतूद करण्यात आली आहे. सोबतच गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम

निवडणूक अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढणार

महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत  आणि कालबद्धरितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम १४ मध्ये, पोट-कलम (२) अंतर्गत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते. मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपीले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने शासनास या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे.

त्या अनुषंगाने राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील, तसेच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२५ काढण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली.

गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखणार; सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या यापूर्वीच्या (दि. २० जानेवारी २०२५) शासन निर्णयातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबतच्या तरतुदींची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यामध्ये आता राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्व गड-किल्ले तसेच राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी व भविष्यातील अतिक्रमणे रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. समितीचे सांस्कृतिक कार्य मंत्री अध्यक्ष असतील. तर समितीमध्ये महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यटन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, वन मंत्री, बंदरे व विकास मंत्री तसेच संबंधित विभागांचे सचिव, प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव यांचा समावेश असणार आहे.

राज्यस्तरीय समितीमध्ये चार निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यास तसेच प्रत्येक जिल्ह्यात गठित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमध्ये चार अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे अशासकीय सदस्य गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांचे अभ्यासक असावेत किंवा संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था असावी, अशी अट ठेवण्यात आली आहे.जिल्ह्यातील गड-किल्ले व राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे रोखणे व ती काढून टाकण्याची कारवाई संबंधित जिल्हाधिकारी यांना त्या-त्या जमिनीच्या मालकीच्या विभागाच्या समन्वयाने करावी लागणार आहे. तसेच यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधीमधून करता येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती