मुंबई : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे आणि प्राधान्याने काम करावे, विशेषतः जिल्हा परिषदांनी या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यभरात अभियानाची अंमलबजावणी, प्रचाराच्या कार्यपद्धती आणि जनसहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तनकारी अभियान असून त्याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. जिल्हा परिषदांनी या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पंचायत समिती, ग्रामपंचायत, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम केल्यासच अभियानाचा अपेक्षित परिणाम साध्य होईल.
अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी पारंपरिक तसेच आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करावा. ग्रामसभांमधून जनजागृती करणे, माहिती फलक, भित्तीपत्रके, डिजिटल माध्यमे तसेच सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून अभियानाची उद्दिष्टे, लाभ आणि अपेक्षित सहभाग नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी एक लोकचळवळ आहे. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्राधान्य देऊन काम केल्यास गाव विकासाच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि राज्यातील पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम बनेल, असा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.