धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे अत्यंत ह्रदयद्रावक दुर्घटना घडली असून विजेचा धक्का लागून चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. विहिरीतील मोटार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढत असताना ही भीषण घटना घडली.केशेगाव येथील गणपत साखरे यांच्या शेतात विहिरीतील मोटार काढण्याचे काम सुरू होते. यावेळी क्रेनचा वरचा भाग महावितरणच्या हायव्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श झाल्याने क्रेनमध्ये अचानक करंट उतरला. याच वेळी मोटार काढण्यासाठी विहिरीजवळ उभे असलेल्या चौघांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत शेतकरी कुटुंबातील बाप-लेकासह दोन मजुरांचा समावेश आहे. एकाच वेळी चार जणांचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नळदुर्ग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या अपघातात कासिम कोंडिबा फुलारी आणि त्यांचा १६ वर्षीय मुलगा रतन कासिम फुलारी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच रामलिंग नागनाथ साखरे आणि त्यांचे वडील नागनाथ साखरे या बाप-लेकाचाही दुर्दैवी अंत झाला. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाइकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
अपघातातील मृतांची नावे :
कासिम कोंडिबा फुलारी (वय ५४)
रतन कासिम फुलारी (वय १६)
रामलिंग नागनाथ साखरे (वय ३०)
नागनाथ साखरे (वय ५५)
ही दुर्घटना शेतकामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यास किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे भीषण उदाहरण ठरली आहे.