पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका मागील चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने लोकशाहीचा उत्सव नागरिकांपासून दूर राहिला होता. आता ही निवडणूक म्हणजे लोकशाही पुनःस्थापनेचा महत्त्वाचा टप्पा असून मतदार राजाचा सन्मान जपण्याचा निर्धार आम आदमी पार्टीने केला आहे, असे मत पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले.
लोकशाही टिकवण्यासाठी आणि पारदर्शक, जनहिताचे प्रशासन देण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक ३८ — बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज येथून प्रशांत कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात दाखल केला.
यावेळी कोणताही गाजावाजा न करता, नागरिकांना कुठलाही त्रास होऊ न देता हा अर्ज सादर करण्यात आला. राजकारणात प्रामाणिकपणे कार्यरत असल्यामुळे आणि लोकसेवेवर ठाम विश्वास असल्याने कुटुंबीयांनीही ठामपणे पाठीशी उभे राहत उमेदवारी अर्ज भरताना प्रशांत कांबळे यांना साथ दिली.हा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमकर तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा भुतकर, सुरेखा भणगे व नीलम शिंगाडे यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आला.
मतदार राजाचा सन्मान राखून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेप्रमाणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांनुसार विकासकामे केली जातील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.स्थानिक पातळीवरील पाणी, रस्ते, वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य व इतर मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असेही प्रशांत कांबळे यांनी स्पष्ट केले.पुणे शहरात बदलाची लाट असून विजय हा नक्कीच आम आदमी पार्टीचाच होणार, असा ठाम विश्वास यावेळी प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केला.