मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. सोमवारपासून ठाकरे बंधू तसेच महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारसभांना सुरुवात होत आहे. यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात असताना, भाजपने कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आपलाच महापौर बसवण्याचा निर्धार केला आहे.ठाकरे बंधूंनी मराठी मतदारांवर लक्ष केंद्रीत केले असून, भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मराठी मतदारांसोबतच उत्तर भारतीय व अन्य अमराठी समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी खास रणनीती आखली आहे.
याच पार्श्वभूमीवर AsceIndia या संस्थेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत एक सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. या सर्व्हेनुसार, मुंबईतील जवळपास निम्मे मराठी मतदार ठाकरे गट आणि मनसेच्या पाठीशी उभे राहणार असले, तरी अमराठी मतदारांचा कौल भाजप–शिंदे गटाच्या बाजूने जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.AsceIndia चे संस्थापक अमिताभ तिवारी यांच्या मते, 2017 साली मुंबईत 55 टक्के मतदान झाले होते आणि यंदाही मतदानाची टक्केवारी याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण आकडेवारी पाहता मुंबईत भाजप–शिवसेनेचाच महापौर बसण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा या सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे.
BMC निवडणूक सर्व्हे: मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी, पण अमराठी मतांमुळे सत्तेचा काटा भाजपच्या बाजूने झुकणार?
BMC निवडणूक सर्व्हे : कोणाला किती टक्के मतं?
मराठी मतदार
भाजप–शिवसेना : 42%
ठाकरे गट–मनसे : 44%
काँग्रेस : 4%
इतर : 11%
मुस्लीम मतदार
भाजप–शिवसेना : 11%
ठाकरे गट–मनसे : 28%
काँग्रेस : 41%
इतर : 20%
अमराठी मतदार
भाजप–शिवसेना : 53%
ठाकरे गट–मनसे : 15%
काँग्रेस : 19%
इतर : 13%
निष्कर्ष
मराठी मतदारांचा कल ठाकरे बंधूंच्या बाजूने असला, तरी अमराठी मतदारांचे निर्णायक मतदान भाजप–शिंदेसेनेला सत्ता मिळवून देऊ शकते, असा अंदाज या सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंना अपेक्षित यश मिळते का, की भाजप मुंबईवर पुन्हा झेंडा फडकवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.