चिपळूण: भाजप नेते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान भोवळ आल्याने एकच धावपळ उडाली. भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांचा आवाज बसला असून, चक्कर येत असल्याची तक्रार करत त्यांनी भाषण आटोपते घेतले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे राणेंनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आणि कार्यक्रमस्थळावरून थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत मोठा बंदोबस्त होता, तर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली.
विशेष म्हणजे, याच घटनेच्या एक दिवस आधी नारायण राणेंनी सार्वजनिक भाषणात राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. “वय झालंय, आता थांबायला हवं,” असे सांगत त्यांनी दोन्ही मुले राजकारणात स्थिरावली असल्याचे नमूद केले. उद्योग सांभाळण्यासाठीही कुणीतरी आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी राजकारणातून बाजूला होण्याचा विचार व्यक्त केला होता.
दरम्यान, सिंधुदुर्गातील सभेत बोलताना राणे म्हणाले होते, “आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. काही जण हातात अंगठ्या, काळ्या काचेच्या गाड्या घेऊन फिरतात, पण माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे. राजकारणात कटकारस्थानं होतात, अडचणी येतात. त्यामुळे आता ठरवलंय—घरी बसायचं. मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे… चांगल्याला जोपासा.”काल दिलेले राजकीय निवृत्तीचे संकेत आणि आजची प्रकृतीची घटना यामुळे राणेंच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चांना वेग आला आहे.