मुंबई/लातूर : लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, असे वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यांच्या विधानानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, तर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याने वागणाऱ्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबतची ही भाषा राजकीय वर्तुळाला रुचली नव्हती. या वादाचे पडसाद लातूर महानगरपालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूरमधील सभेत स्पष्ट भूमिका मांडत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कार्याबद्दल मला आणि भाजपला नितांत आदर आहे,” असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
लातूरने महाराष्ट्राला मोठे नेतृत्व दिल्याचे नमूद करत फडणवीस म्हणाले, “चाकूरकर साहेबांपासून ते शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख—या सर्वांनी लातूरची ओळख देशपातळीवर नेली. विलासराव देशमुख हे पक्षाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणारे नेते होते.”
चव्हाणांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले, “दोन दिवसांपूर्वी येथे काही संभ्रम निर्माण झाला. अध्यक्षांचे शब्द कदाचित चुकीच्या पद्धतीने गेले असतील. त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मी जाहीरपणे सांगतो—आमची राजकीय लढाई काँग्रेसशी आहे; विलासराव देशमुखांबद्दल आमचा नितांत आदर कायम आहे.”फडणवीसांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर लातूरमधील नाराजी शमते का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.