पुणे : मजबूत, प्रेरणादायी आणि परंपरेशी नाळ जोडणारी अणवाणी पायाने केलेली मशाल दौड आज केवळ एक क्रीडा उपक्रम न राहता इतिहासाला दिलेली जिवंत मानवंदना ठरली. राजमाता जिजाऊ यांच्या ४२८व्या जयंतीनिमित्त लाल महाल, पुणे ते मोरेवस्ती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) या मार्गावर ही विशेष मशाल दौड आयोजित करण्यात आली होती.
ही मशाल दौड श्री गणेश व्यायाम मंडळ व ब्रह्मसिंह गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. जिजामातांचे संस्कार, नीतिमत्ता व राष्ट्रघडणीचे आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. जिजामाता केवळ शिवरायांच्या माताच नव्हत्या, तर राष्ट्र घडविणाऱ्या मातृशक्ती होत्या—ज्यांनी “दोन छत्रपती घडविले,” या विचाराला या दौडीने अधोरेखित केले.या कार्यक्रमाला विशेष प्रेरणा देण्यासाठी भूमी वाबळे ताई उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणामुळे उपस्थित मुलांमध्ये मूल्यांची जाणीव व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली.
अणवाणी पायाने ही मशाल दौड यशस्वीपणे पूर्ण करण्याचा मान आरोही बनसोडे, ध्रुविता चव्हाण आणि श्वेता लिमन या धाडसी मुलींनी मिळवला. त्यांच्या सहभागातून आजच्या पिढीतील सामर्थ्य, शिस्त आणि समर्पण स्पष्टपणे दिसून आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्यम, गणेश, कल्पेश आणि गुणवंत यांनी मोलाचे योगदान दिले.ही मशाल दौड केवळ प्रवास नव्हती, तर इतिहास जपण्याची आठवण, मूल्ये आचरणात आणण्याचा संकल्प आणि राजमाता जिजाऊंचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देणारा उपक्रम ठरला.
जय जिजाऊ! जय शिवराय!