बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनानं केवळ राजकीय विश्वच नाही, तर संपूर्ण देश हळहळला आहे.मराठी अभिनेता संकर्षण कराडे यांनी या घटनेनंतर सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहून आपली मर्मस्पर्शी भावना व्यक्त केली. त्यांनी म्हटले:
"मा. अजित पवार सरांचं जाणं फार दुर्दैवी. काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली की आधार वाटतो. त्यातले अजितदाद पवार हे तसे आधार वाटायचे. आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटत आहे, खूप त्रास होतोय. गंभीर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्यांची शैली कमाल होती. त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले ही भावना मी समजू शकतो. अपघातात त्यांच्यासह प्राण गमावलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. अजित दादा.. खूप आठवण येत राहील..."
अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास अशा महत्त्वाच्या खात्यांचा प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान येथे विविध दिग्गज राजकीय आणि सिनेसृष्टीतील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते आणि आमदार सहभागी होत आहेत.अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोल्हापूर, बारामती, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि इतर ठिकाणांहूनही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत.