मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आणि त्यांनी तातडीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी अत्यंत भावनिक आणि परखड पोस्ट शेअर केली आहे.
अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोणीही भरू शकणार नाही, असे नमूद केले आहे. तसेच अंत्यसंस्कारानंतर लगेचच राजकीय समीकरणे जुळवण्याची घाई झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
तरीही सुनेत्रा पवार यांनी शपथ घेण्याचा निर्णय त्यांनी “क्रूर वाटला तरी राजकीयदृष्ट्या आवश्यक” असल्याचे म्हटले आहे. अजित पवारांनी उभ्या केलेल्या राजकीय आणि प्रशासकीय वारशावर कोणाची वक्रदृष्टी पडू नये, यासाठी हा निर्णय गरजेचा होता, असे मत अंधारे यांनी व्यक्त केले.
अहिल्यादेवी होळकर यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, पतीच्या निधनानंतरही त्यांनी राज्यकारभार सांभाळला आणि साम्राज्य टिकवले. त्याच धर्तीवर सुनेत्रा पवार यांच्यावरही मोठी जबाबदारी आली असल्याचे अंधारे यांनी नमूद केले.
तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत सावध राहण्याचा सल्ला देत, “तुम्ही गुंगीगुडिया नाही, तर दादांच्या तालमीत घडलेले नेतृत्व आहात,” असे त्यांनी म्हटले आहे.विरोधी पक्षातील नेत्या असतानाही अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आणि गरज पडल्यास महिलांवरील अन्यायाविरोधात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.शेवटी त्यांनी लिहिले की, ही केवळ अनुकंपेची संधी नसून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याची ऐतिहासिक संधी आहे.