मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ फेब्रुवारी रोजी येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात शोकाचे वातावरण असताना आनंदोत्सव करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांना वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन केले आहे.तसेच त्यांनी विनंती केली आहे की, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नयेत किंवा शुभेच्छांचे होर्डिंग्ज, बॅनर लावू नयेत. सार्वजनिक ठिकाणी कोणताही जल्लोष किंवा मेळावे होऊ नयेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
यावेळी शिंदे म्हणाले, “अजित दादांच्या जाण्याने मला वैयक्तिक मोठा धक्का बसला आहे. मी एक सहकारीच नव्हे तर जवळचा मित्र गमावला आहे. ही पोकळी भरून निघणारी नाही. पवार कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णपणे सहभागी आहे.”राज्य अजूनही या धक्क्यातून सावरलेले नसताना वाढदिवस साजरा करणे उचित वाटत नाही, असे सांगत त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्याचे आवाहन केले आहे.