पुणे: इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात घडलेल्या तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. लग्नाची खरेदी करण्यासाठी आई आणि भावासोबत गेलेल्या तरुणीचे दोन तरुणांनी डोळ्यात तिखट टाकून अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अपहरणाचा आरोप असलेल्या तरुणामध्ये मागील दीड महिन्यात तब्बल 11 वेळा संपर्क झाल्याचे आढळले आहे. यामध्ये तीन वेळा संबंधित तरुणाने फोन केले असून आठ वेळा तरुणीने एसएमएस पाठवले आहेत. विशेष म्हणजे हे तीन कॉल मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आले असून त्यांचा कालावधी केवळ तीन ते पाच सेकंद इतकाच होता. त्यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअॅप कॉल झाल्याची नोंद असून त्याचे तपशील मिळविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण आणि जबरी चोरीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्ख्या भावांची नावे समोर आली आहेत. दोन्ही संशयित सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विविध मार्गांची तपासणी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान दोघांमध्ये फोन आणि टेक्स्ट मेसेजद्वारे संवाद झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीतील कॉल डिटेल्स मागवण्यात आले असून नियमित सिमकार्डवरून संवाद झाल्याची माहिती मिळाली आहे. व्हॉट्सअॅपवरील चॅट आणि कॉल डिटेल्स अद्याप मिळालेले नसून त्यासाठीही प्रक्रिया सुरू आहे.
दोन्ही कुटुंबे शेजारी राहत असून लहानपणापासून एकमेकांची ओळख असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या धर्मांचा संदर्भ असल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, तरुणीच्या काकांनी पोलिस तपासाबाबत नाराजी व्यक्त करत मुलीचा शोध लवकरात लवकर लावावा, अशी मागणी केली आहे. संबंधित तरुणी शिक्षणासाठी नव्हे तर लग्नासाठी गावी आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.