जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त जुन्नर येथील शिवनेरी किल्ला परिसरात मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी उसळली. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून हजारो शिवभक्त शिवरायांच्या जन्मस्थळाला अभिवादन करण्यासाठी गडावर दाखल झाले होते. मात्र, वाढत्या गर्दीमुळे नियोजनावर ताण आला आणि गडावर चेंगराचेंगरीची घटना घडली.प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत सुमारे १५ ते २० शिवभक्त किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अरुंद मार्गांमुळे गोंधळ
गडावरील अंबरखाना परिसराखालील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा हे मार्ग अरुंद असल्याने एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविकांची हालचाल सुरू होती. काही जण गडावर चढत होते, तर काही जण खाली उतरत होते. या दोन्ही दिशांनी सुरू असलेल्या गर्दीमुळे ढकलाढकली झाली आणि काहीजण खाली पडल्याने परिस्थिती चेंगराचेंगरीत रूपांतरित झाली.
जयघोषात रंगलेला उत्सव, मात्र नियोजन ढासळले
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असताना गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. शिवज्योत घेऊन आलेले तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे सांगितले जात आहे.प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था आणि गर्दी नियोजन अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.