उरण : "महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी शिवरायांनी अपरिमित त्याग केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आठवले तरी अंगावर काटा येतो. त्यामुळे शिवरायांची जयंती साजरी करणे आपले कर्तव्य आहे. २०१८ मध्ये पुतळा समिती स्थापन करण्यात आली. महेंद्रशेठ घरत त्यात अग्रेसर आहेत. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करूनही सिडको आपल्याला भूखंड देत नाही, पाच कोटी रुपये आपल्याकडून मागतात. त्यामुळे मी सिडकोचा धिक्कार करतो. सिडकोचे अधिकारी हे झारीतले शुक्राचार्य आहेत. तिरुपती मंदिरासाठी १ रुपये दराने सरकार जागा देते, पण आपल्याकडून मात्र पैशांची मागणी केली जात आहे. हे दुर्दैव आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांची सरकार उपेक्षा करत आहे, जानेवारीपर्यंत भूखंड मिळाला नाही तर सिडको आणि प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी या आमदारांच्या घरावर मोर्चा काढू," असे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी ठणकावून सांगितले. ते खारकोपर येथे शिवजयंती निमित्त बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "मैदानाला कंपाऊंड वॉल हवी. गव्हाण ग्रामपंचायतीच्या ताब्यात भूखंड द्यावा."
यावेळी रामशेठ ठाकूर, महेंद्रशेठ यांनी शिवरायांना अभिवादन केले.यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "जगाचे मॅनेजमेंट गुरू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा जगालाही सार्थ अभिमान आहे. ज. आ. भगत साहेब यांनी १९८१ मध्ये शिवरायांचा पुतळा कोपर फाट्यावर उभारला आहे. आता आपल्याला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अटल सेतू जवळच उभारायचा आहे. कारण रयतेचे राजे एकच म्हणजे शिवाजी महाराज. महिलांचा सन्मान करणारे एकमेवाद्वितीय शिवाजी महाराज. त्यांच्यामुळेच आपण आज सन्मानाने जगतोय. त्यामुळे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणे ही आपली अस्मिता आहे. त्यामुळे १ रुपया दराने भूखंड मिळाला नाही तर सिडकोच्या अधिकारी वर्गाला पळता भुई थोडी करू. आपला इतिहास हा आंदोलनांचा आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही जागा दाखविण्याची आज वेळ आली आहे.
सिडकोच्या एमडींना तीन वेळा येथे आणले. पाच कोटी मागणे सिडकोच्या कुठल्या तत्त्वात बसते. रामशेठ करारी आहेत. आता लढल्या शिवाय आपल्याला पर्याय नाही."आरोही राळे या विद्यार्थिनी शिवरायांची वेशभूषा परिधान केली होती.शिवरायांची युद्ध कला विद्यार्थ्यांनी सादर केले. आरोही राळे, स्वरा सुतार, सिद्दिका शेख, आयुषी सोनटक्के या विद्यार्थिनींनी शिवरायांचा पराक्रम सांगून श्रोत्यांना जिंकले.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उलवे नोडमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. ३५० वर्षांपूर्वी भारतभूमीवर शिवराय जन्माला आले. रयतेचा राजा म्हणजे शिवराय. त्यामुळे संपूर्ण परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला होता.यावेळी माजी खासदार रामशेठ, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, जे. एम. म्हात्रे, वाय. टी. देशमुख, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, अरुणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, रत्नप्रभा घरत, जयवंत देशमुख, रविशेठ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.