धुळे : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे विवाहसोहळ्यादरम्यान उसळलेल्या वादाचे भीषण रूप धारण झाले. धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लग्नपत्रिकेत काही नावे न छापल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये आधीपासून तणाव होता. हा वाद गुरुवारी साखरपुड्याच्या कार्यक्रमात पुन्हा उफाळून आला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. हल्ल्यात सोनू गोसावी आणि देवेंद्र पवार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर साई गोसावी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपींचा शोध घेतला. काही आरोपी गुजरातकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.
माहितीनुसार, सोनगड येथील काही व्यक्तींची नावे लग्नपत्रिकेत नमूद न केल्याने काही महिन्यांपूर्वीच वाद निर्माण झाला होता. तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये वर्चस्वाच्या मुद्द्यावरूनही दोन्ही बाजूंमध्ये मतभेद होते. त्यातूनच हा तणाव वाढल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि वाहनचालकाला अटक करण्यात आली असून आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.