नाशिक : सामूहिक प्रयत्नांतूनच आपण शिक्षणाचा प्रसार अधिक व्यापक करू शकतो. उल्लास – नव साक्षरता अभियानातून शासन, शिक्षक, स्वयंसेवक व समाज यांच्या संयुक्त सहभागातूनच ‘साक्षर भारत’ चे स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.सीएमसीएस कॉलेज येथे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय उल्लास मेळावा 2026 कार्यक्रम प्रसंगी मत्री भुसे बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक योजना, पुणे कृष्णकुमार पाटील, राज्य शैक्षणिक संशोधपन व प्रशिक्षण परिषद पुणेचे सहसंचालक डॉ. कमलादेवी अवटे, नाशिक बोर्डचे विभागीय अध्यक्ष डॉ.सुभाष बोरसे, शिक्षण संचालक योजना संचालनालय पुणे डॉ.वंदना वाहुल, कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक प्रभावती कोळेकर, विभागीय उपसंचालक नाशिक विभाग संजयकुमार राठोड, प्राचार्य रंजना लोहकरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) साईलता सामलेटी, शिक्षणाधिकारी योजना सरोज जगताप यांच्यासह अधिकारी, शिक्षक, नवसाक्षर नागरिक उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्या शिफारसींच्या अनुषंगाने केंद्र सरकारने उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रम हा उपक्रम १ एप्रिल २०२२ पासून सुरू केला आहे. देशातील एकही नागरिक निरक्षर राहू नये, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात, प्रत्येक परिसरात अजूनही निरक्षर असलेल्या बांधव-भगिनींना साक्षर करण्याचे कार्य सुरू आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षक, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे पवित्र व सेवाभावी कार्य समर्पित भावनेने राबविण्यात येत आहे. समाजातील आजी-आजोबा, आई-वडील, महिलावर्ग तसेच विविध कारणांमुळे शिक्षणापासून दूर राहिलेल्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. बदलत्या काळात शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढले असून प्रत्येक व्यक्ती साक्षर आणि सक्षम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक व्यक्तींनी अत्यंत कठीण परिस्थितीतही साक्षरता वर्गांमध्ये सहभागी होऊन वाचन-लेखन शिकण्याचा प्रयत्न केला आहे. काहींना आपल्या विद्यार्थी, शिक्षक किंवा शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून अक्षरओळख झाली आहे, ही समाजासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. पूर्वी असाक्षर व्यक्तींना अक्षरओळख, अंकओळख किंवा मुळाक्षरे व वन टू थ्री फोर अशा मूलभूत गोष्टी शिकवाव्या लागत असत. परंतु आता काळ बदलला आहे. आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार, मोबाईलचा वापर, ऑनलाईन सेवा यासाठीही व्यवहारीक साक्षरता आवश्यक ठरली आहे. त्यामुळे केवळ वाचन-लेखन नव्हे, तर डिजिटल साक्षरता देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
या उपक्रमांसाठी विविध शैक्षणिक साधने, प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातही अशा उपक्रमांना चालना देण्यासाठी आवश्यक निधी व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देशातील विविध राज्यांमध्ये साक्षरता व शिक्षणविषयक अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांअंतर्गत शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देणे तसेच जिल्हा स्तरावर शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिक्षण संचालक श्री. पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बागलाण तालुक्यातील धनश्री देवरे, उज्वला नाडेकर पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रोहिणी झोले, लक्ष्मी वारघडे, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील आशा कांबळे या नवसाक्षरांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मंत्री भुसे यांनी विविध शैक्षणिक साहित्य प्रदर्शनासही भेट दिली.