लातूर : घरात शोककळा पसरलेली, नातेवाईकांचा आधार आणि डोळ्यांत अश्रू… अशा हृदयद्रावक परिस्थितीतही १७ वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षणाला प्राधान्य देत बारावीच्या गणिताचा पेपर दिल्याची प्रेरणादायी घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.
अहमदपूर तालुक्यातील हागदळ-गुगदळ भोजूचीवाडी येथील कु. शिवानी माधव देवकत्ते हिच्या वडिलांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यात वाहनचालक म्हणून काम करणारे माधव देवकत्ते हे कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता गावात अंत्यसंस्कार पार पडले. मात्र त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता जळकोट येथील श्री गुरुदत्त ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीचा गणिताचा पेपर नियोजित होता. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दीड तासात शिवानीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
“वडिलांनी शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे,” या निर्धाराने तिने जवळपास ५० किलोमीटरचा प्रवास करत परीक्षा केंद्र गाठले. अत्यंत कठीण मानसिक अवस्थेतही तिने शांतपणे पेपर लिहिला.
ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून शिवानीच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वैयक्तिक दुःख कितीही मोठे असले तरी शिक्षण आणि स्वप्नांसाठी चिकाटी ठेवण्याचा संदेश या घटनेतून मिळत आहे.