पुणे : स्वतःचे अपहरण झाल्याचे खोटे नाटक रचून कुटुंबीयांकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या २९ वर्षीय युवकाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ११ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवक हा मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील असून तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. ९ फेब्रुवारी रोजी तो गावी जाणार असल्याचे सांगून निघाला होता. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना फोन करून त्याचे अपहरण झाल्याचे सांगण्यात आले. “तुम्हाला तुमच्या मुलाला जिवंत पाहायचे असेल तर दोन लाख रुपये द्या, अन्यथा त्याला मारण्यात येईल,” अशी धमकी देण्यात आली होती.
याप्रकरणी कुटुंबीयांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी युवकाचा माग काढला. तपासादरम्यान तो पुणे, अहमदाबाद (गुजरात) आणि प्रयागराज येथे फिरत असल्याचे आढळून आले.
तपास पथकाने प्रयागराज येथे जाऊन संबंधित युवकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आर्थिक अडचणीमुळे स्वतःचे अपहरण झाल्याचे नाटक रचून नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा कट केल्याची कबुली दिली. सुरुवातीला त्याने २ लाखांची मागणी केली होती. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर ही बाब उघडकीस आली.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.