बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू तसेच नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांच्यावर गंभीर आरोप करत, VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर दुपारी 1.36 वाजता DGCA कडून प्राथमिक अहवाल जारी करण्यात आला. या अहवालात फेब्रुवारी महिन्यात VSR कंपनीच्या विमानाचे ऑडिट झाले असून, त्यावेळी लेव्हल-1 प्रकारातील कोणतीही गंभीर त्रुटी आढळली नव्हती, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी अजित पवार यांचे पार्थिव रुग्णालयात असताना आणि शवविच्छेदन सुरू असतानाच कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की, DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच VSR कंपनी, संबंधित एरो कंपनी आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्यासाठी ते मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनीही 28 जानेवारीलाच संबंधित विमानात सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही त्रुटी नसल्याचे विधान केले होते. तसेच पायलटबाबतही शंका नसल्याचे सांगितले होते, याकडेही रोहित पवार यांनी लक्ष वेधले.मात्र, काल सादर झालेल्या ताज्या अहवालात VSR कंपनीच्या विमानाच्या विशेष तपासणीत अनेक त्रुटी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. उड्डाणापूर्वीचे एअरवर्दीनेस प्रमाणपत्र, एअर सेफ्टी आणि फ्लाईट ऑपरेशन या सर्व स्तरांवर त्रुटी असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही कंपनीला काही प्रमाणात पळवाट दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांना हस्तक्षेपाची मागणी
या संपूर्ण प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. मुंबईत FIR दाखल न झाल्यास बारामतीत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.“हा लढा केवळ माझा नाही, तर जनतेचा आहे. सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, DGCA आणि संबंधित यंत्रणांकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.