मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून या प्रकरणाभोवती संशयाचे सावट गडद होत आहे. विविध राजकीय नेत्यांकडून या दुर्घटनेबाबत सखोल चौकशीची मागणी सातत्याने केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहीत पॉवर यांनी संबंधित यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत डीजीसीएच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी तसेच संबंधित VSR कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिंदे गट VSR ची विमाने टाळणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांच्या सूचनेनुसार VSR कंपनीची विमाने यापुढे वापरू नयेत, असा निर्णय मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयानंतर शिंदे गटातील नेते व मंत्री VSR कंपनीच्या विमानसेवेपासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकशीबाबत सवाल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. झारखंडमध्ये घडलेल्या अन्य एका विमान दुर्घटनेनंतर तातडीने कारवाई झाली, मात्र VSR प्रकरणात तशी तत्परता का दिसत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. डीजीसीएकडून निष्काळजीपणा झाला का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.याशिवाय, संबंधित विमानाची तांत्रिक स्थिती, पायलटांची नियुक्ती आणि देखभाल प्रक्रियेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत असून या सर्व मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत चौकशी अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानंतरच दुर्घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.