मुंबई:इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि काही हवाई मार्ग बंद झाल्यामुळे दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने हालचाल केली आहे. उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत विशेष विमानांची व्यवस्था केल्याची माहिती देण्यात आली आहे.फुजैरा विमानतळावरून आज दुपारी स्टार एअर ची दोन विशेष उड्डाणे मुंबईकडे रवाना होणार आहेत.
VT-GSO – दुपारी ३.३० वाजता
VT-GSH – दुपारी ४.३० वाजता
या दोन्ही उड्डाणांद्वारे एकूण १६४ प्रवासी मुंबई विमानतळावर सायंकाळी साडेपाच ते सातदरम्यान पोहोचण्याची अपेक्षा आहे. या प्रवाशांमध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड आणि अहिल्यानगर परिसरातील इतर नागरिकांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला होता. राज्य सरकार त्यांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून सर्वांना सुखरूप परत आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानंतर संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून या विशेष उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवले असून विविध प्रशासकीय यंत्रणांशी संपर्क कायम ठेवला आहे. केंद्र सरकारशीही सातत्याने समन्वय सुरू असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे या प्रक्रियेचा समन्वय सोपविण्यात आला आहे.
अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला असून मदतीची गरज असल्यास संबंधितांनी त्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आखाती देशांतील परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र सरकार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.