इराण : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका-इस्रायल तणावाचा परिणाम आता भारतीयांवरही दिसू लागला आहे. आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर अनिश्चिततेची छाया निर्माण झाली असून काही जण बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक आर्थिक व्यवहार मंदावले आहेत आणि त्याचा थेट परिणाम कामगारांवर होत आहे.
माहितीनुसार, अरब देशांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे १५ हजार भारतीय कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांमध्ये अनेक प्रकल्प आणि व्यावसायिक कामकाज मंदावले आहे. पुढील काही महिन्यांत रोजगार उपलब्ध होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
युद्धामुळे काही विमानसेवा विस्कळीत झाल्याने अनेक भारतीय कामगार तेथील देशांमध्येच अडकून पडले आहेत. मायदेशी परतण्यासाठी पर्यायी उड्डाणे उपलब्ध असली तरी त्यांची तिकीटे अत्यंत महाग असल्याने ती कामगारांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे नोकरी गमावण्याच्या भीतीसोबतच परतीच्या प्रवासाचा प्रश्नही त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. भारतातील त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंता वाढली आहे.
आखाती देशांमध्ये भारतीय कोणत्या क्षेत्रात काम करतात?
आखाती देशांतील भारतीय केवळ मजुरीपुरते मर्यादित नसून विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
अकुशल व निमकुशल कामगार : बांधकाम, तेल-वायू प्रकल्प, ड्रायव्हिंग, स्वच्छता सेवा आणि घरगुती मदत.
कुशल व्यावसायिक : आयटी क्षेत्र, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर तसेच बँकिंग व वित्तीय सेवा.
आरोग्य सेवा : नर्स, डॉक्टर आणि लॅब तंत्रज्ञ म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतीय कार्यरत.
सेवा क्षेत्र : हॉटेल, रिटेल, विक्री आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही भारतीयांचा मोठा सहभाग आहे.
भारतातील कोणत्या राज्यांतून सर्वाधिक स्थलांतर?
आखाती देशांत रोजगारासाठी जाणाऱ्यांमध्ये काही राज्यांचा मोठा वाटा आहे.
उत्तर प्रदेश – सर्वाधिक कामगार
बिहार – अकुशल मजुरांमध्ये मोठा वाटा
केरळ – कुशल व आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ
तामिळनाडू आणि राजस्थान – वाढते स्थलांतर
आखाती देशांमधील भारतीयांची अंदाजित संख्या
२०२५-२६ च्या अंदाजानुसार, आखाती देशांमध्ये सुमारे ९० लाख ते १ कोटी भारतीय राहतात.
संयुक्त अरब अमिराती – सुमारे ४३ लाख
सौदी अरेबिया – सुमारे २७ लाख
कुवेत – १० लाख
ओमान – ८.३ लाख
कतार – ६.८ लाख
बहरीन – ३.२ लाख
युद्धामुळे होणारे संभाव्य परिणाम
सुरक्षेची चिंता : संघर्ष वाढल्याने भारतीय कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण.
आर्थिक परिणाम : तेल दरातील चढउतार आणि महागाईमुळे रोजगारावर परिणाम.
रेमिटन्स घट : भारतात येणाऱ्या परकीय चलनात १० ते २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता.
परतण्याची अडचण : विमानसेवा कमी असल्याने तातडीने मायदेशी परतणे कठीण.दरम्यान, काही देशांतील भारतीय दूतावासांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले असून, गरज भासल्यास भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.