मुंबई : राज्यातील शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या हिरवा वाटाणा ऐवजी पांढरा वाटाणा पुरवला जात असल्याची चौकशी सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांकडून करणार आहोत. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे विधानसभेत स्पष्ट केले.आमदार कैलास घाडगे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवल्या जाणारा आहार हा विद्यार्थ्यांना सकस मिळावा यासाठी शासनाकडून दर निश्चित करण्यात आलेले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि बाजार समितीमधील धान्याचे चालू दर विचारात घेऊनच निविदा काढली जाते, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “निविदा निश्चित करण्यापूर्वी अन्नाचे नमुने घेतले जातात आणि त्यांची प्रमाणित लॅबमध्ये तपासणी केली जाते. हा माल दर दोन महिन्यांनी शाळांना पुरवला जातो.”या प्रश्नाच्या चर्चेत आमदार रमेश बोरनारे, डॉ. नितीन राऊत यांनी सहभाग घेतला.