मुंबई : राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी परखड प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुंबईत एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणासह राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं.
ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही अशा भोंदूबाबांना संरक्षण मिळत असेल, तर संबंधितांवरही कारवाई झाली पाहिजे. “अजून किती खालच्या पातळीवर जायचं आहे?” असा सवाल करत त्यांनी सरकारला इशारा दिला. गावागावात सक्रिय असलेल्या भोंदूगिरीवर कठोर पावलं उचलण्याची वेळ आली असून, कोणत्याही पक्षाशी संबंध असला तरी कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
महाविकास आघाडीच्या काळातही या बाबाला मदत मिळाल्याच्या आरोपांवर उत्तर देताना ठाकरेंनी सर्वंकष चौकशीची भूमिका घेतली. “पाणी कुठपर्यंत मुरलंय ते समोर येऊ द्या,” असं म्हणत त्यांनी कोणतीही गोष्ट दडपली जाऊ नये, असं स्पष्ट केलं.
याचवेळी सातारा जिल्ह्यातील राजकीय मारहाणीच्या घटनेवरही त्यांनी टीका केली. विरोधकांनी अधिवेशनात अनेक भ्रष्टाचार उघड केल्याचा दावा करत, “ढोंगीपणावरचं पांघरूण आता सरकारने काढावं,” असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, लॉजिस्टिक कोर्स सुरू करण्यामागचा उद्देश सांगताना ठाकरेंनी स्थानिक तरुणांना रोजगारक्षम बनवण्यावर भर दिला. वाढत्या लॉजिस्टिक क्षेत्रात मराठी युवकांना संधी मिळावी यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.