मुंबई: राजकीय मतभेदांमुळे अनेकदा एकमेकांवर टीका करणारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात विधान परिषदेत मात्र वेगळाच क्षण पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील कार्यकाळाच्या समाप्तीनिमित्त आयोजित निरोपपर भाषणात एकनाथ शिंदे यांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात शिंदे म्हणाले की, “उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.” विशेष म्हणजे, शिंदे यांनी ‘साहेब’ असा आदरपूर्वक उल्लेख केल्याने सभागृहात उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.
या निरोप समारंभात विधान परिषदेतील एकूण नऊ सदस्य निवृत्त होत असून, शिंदे यांनी सर्वांच्या कार्याचा गौरव केला. नीलम गोऱ्हे यांच्या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी त्यांच्या संयमी आणि न्याय्य भूमिकेचा विशेष उल्लेख केला.
तसेच अमोल मिटकरी यांना ‘फायरब्रँड नेता’ म्हणत त्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे आणि सामाजिक विषयांवरील अभ्यासाचेही शिंदे यांनी कौतुक केले. रणजित मोहिते पाटील यांच्या शांत आणि विकासाभिमुख कामाची दखल घेतली, तर शशिकांत शिंदे यांच्याबाबत बोलताना त्यांच्या लढाऊ स्वभावाचा उल्लेख केला.एकूणच, राजकीय कटुतेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत दिसलेला हा सौम्य आणि सकारात्मक संवाद हा चर्चेचा विषय ठरला आहे.