पुणे : हुतात्मा राजगुरु स्मारक विकास आराखडा हा मूलभूत सुविधा आणि बांधकामाचा आराखडा नसून देशाला विश्वगुरु म्हणून कार्य करणाऱ्यांचे प्रेरणास्रोत, प्रेरणास्थळ आहे, त्यामुळे या आराखड्याकरिता करण्यात येणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना भरीवस्वरूपात मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.शहिदी दिवस आणि वंदेमातरम सार्ध शताब्दी १५० वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मिळून राज्यातील सर्व तालुक्यात ‘वंदे मातरम‘ गीताचे सामूहिक गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभाग, राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राजगुरुनगर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहिदी दिवस आणि वंदेमातरम सार्ध शताब्दी १५० वर्षानिमित्त चांडोली, राजगुरूनगर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार बाबाजी काळे, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अगरवाल, सहसचिव समर नंदा, सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.
ॲड. शेलार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजा पासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळकापासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत जगाला आणि देशाला प्रेरणा देणारे नेतृत्व, कर्तृत्व आणि महापुरूषाची भूमी महाराष्ट्र आहे. हुतात्मा राजगुरु यांच्या जन्म आणि पदस्पर्शाने पावन झालेले राजगुरुनगर आणि येथील माती आपल्याला पदोपदी प्रेरणा देणारी आहे. शहिद भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी तारुण्यात देशासाठी बलिदान दिले तो दिवस देशभरात शहिदी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या अमरत्वाची गोष्ट आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे.
जगभरात इंग्रजांची वास्तववादी भांडवलशाही आणि हुकूमशाही होती, त्याकाळात इंग्रजांना ‘सळो की पळो‘ करण्याची ताकद ‘वंदे मातरम‘ गीतामध्ये होती. स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लाखो युवक-युवती, कष्टकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी आदी घटकांच्या मुखातून येणाऱ्या घोषणा, गीत तसेच आंदोलन आणि सत्याग्रहात केंद्रस्थानी ‘वंदे मातरम‘ प्रेरणागीत होते, आज या गीताला १५० वर्ष पूर्ण झाले आहे.
देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यात ‘वंदे मातरम‘ गीत हे केंद्रस्थानी होते, या गीताची प्रेरणा घेत स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारकांनी दिलेले त्याग, समर्पण देश कधीच विसरू शकणार नाही, त्यांचे योगदान स्मरणात ठेवणे आपले कर्तृत्व आहे, त्यासोबतच येत्या काळात भारत देशाला विकसित करण्यामध्ये आपल्या करावयाच्या कार्यामध्ये वंदे मातरम गीत प्रेरणास्थानी आहे.
राजगुरुनगर, खेड, आंबेगाव परिसरात पायाभूत सुविधांची विविध कामे करण्यात येत आहे, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखडयाच्या अनुषंगाने चर्चा करून मार्ग काढून विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, ॲड. शेलार म्हणाले.श्री.काळे म्हणाले, स्वातंत्र्य संग्रामात वंदेमातरम गीत प्रेरणादायी ठरले. आज या गीताच्या सार्ध शताब्दी १५० वर्षानिमित्त आजही शहिदाच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारावर वाटचाल करीत आहोत.हुतात्मा राजगुरु स्मारक विकास आराखड्याकरिता भूसंपादन आणि त्यामाध्यमातून होणाऱ्या बाधित नागरिकांच्या घराचा प्रश्न सोडवावा, तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखडयाच्या अनुषंगाने श्री. काळे यांनी सूचना केली.
श्री. अगरवाल म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वंदेमातरम सार्ध शताब्दी १५० वर्षानिमित्त देशाच्या विविध भागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची घोषणा केली. तसेच शहिदी दिवसाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारक हुतात्मा शिवराम, हरी राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा भगतसिंग यांच्यासह अन्य स्वातंत्र्यसेनानींच्या स्मृतींना उजाळा देण्यासासोबतच तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी राजगुरुनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य संग्रामामध्ये ‘वंदे मातरम‘ स्वातंत्र्य सेनानीकरिता प्रेरणादायी गीत होते. ‘वंदे मातरम‘ मोहिमेत जवळपास ९ कोटीहून अधिक नागरिक सहभागी झाले आहे तसेच स्वातंत्र्य संग्रामावर आधारित भव्य प्रदर्शनाला आज एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे, आपणही या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा, असे आवाहन श्री. अगरवाल यांनी केले.ॲड. शेलार यांनी या प्रदर्शनात स्वातंत्र्य संग्रामावर आधारित प्रदर्शित केलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील दुर्मिळ छायाचित्रे, माहिती फलकांची पाहणी केली.
यावेळी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत यांची चित्रफीत दाखविण्यात आली.वंदेमातरम सार्ध शताब्दी १५० वर्षानिमित्त नागरिकांच्या सहभागादृष्टीने केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली चित्रफीत दाखविण्यात आली.
यावेळी राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, राजगुरुनगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, मुख्याधिकारी अंबादास मर्कळ, हुतात्मा राजगुरु स्मारक समितीचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, नागरिक आदी उपस्थित होते.सांस्कृतिक कार्यक्रमात वंदे मातरम.. आणि ऐ मरे वतन के लोगो.. या देशभक्तीपर गीताने रसिक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाच्यापूर्वी ॲड. आशिष शेलार यांनी हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळी जावून अभिवादन केले आणि हुतात्मा राजगुरु स्मारक विकास आराखड्याअंतर्गत सुरु असलेल्या विकासकामाची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.