पुणे: पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेत वॉटर कुलरमधून पाणी पिताना लागलेल्या तीव्र विजेच्या धक्क्यामुळे २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असतानाही अखेर मंगळवारी त्याने प्राण गमावले. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मृत विद्यार्थी चैतन्य पुंडलिक चव्हाण हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवासी होता. तो कृषी महाविद्यालयात एमबीए (ABM) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे.
१४ मार्च रोजी रात्री जेवणानंतर चैतन्य मेसमध्ये पाणी पिण्यास गेला होता. वॉटर कुलर नीट कार्यरत नसल्याने त्याने त्याची पिन पुन्हा सॉकेटमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नळाला स्पर्श करताच त्याला जोरदार विद्युत धक्का बसला आणि तो काही काळ तिथेच अडकून पडला. इतर विद्यार्थ्यांनी तातडीने वीजपुरवठा बंद करून त्याला खाली उतरवले, मात्र तो बेशुद्ध झाला होता.
घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र विजेच्या धक्क्यामुळे मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, मेसमध्ये चपला घालण्यास बंदी असल्याने अनेकजण अनवाणी फिरतात. त्यामुळे अशा परिस्थितीत विजेचा धक्का अधिक तीव्र बसण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
या घटनेनंतर संबंधित प्रशासनाने सर्व कृषी महाविद्यालयांमध्ये विद्युत, अग्नि आणि इमारत सुरक्षेचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून, या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण, याचा शोध घेतला जात आहे.