मुंबई: राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज दोन महिने पूर्ण झाले. 28 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. दोन महिने उलटूनही त्यांच्या जाण्याची पोकळी राजकीय व सामाजिक क्षेत्रात तीव्रतेने जाणवत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक शब्दांत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, काळ पुढे जात असला तरी मन अजूनही त्यांच्या आठवणींमध्ये अडकलेले आहे. दैनंदिन कामकाज करताना त्यांच्या मार्गदर्शनाची आणि उपस्थितीची जाणीव सतत होत राहते.
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, अजित पवार यांचे लोकाभिमुख नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सर्वसामान्यांशी असलेला जवळीक हा त्यांचा खरा ठेवा आहे. त्यांनी अनेकांना संधी दिली, आत्मविश्वास दिला आणि आयुष्यात उभे राहण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे ते केवळ एक राजकारणी नव्हते, तर अनेकांसाठी आधारस्तंभ होते.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल ही शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असून अजित पवार यांच्या प्रेरणेनेच पुढे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नसली तरी त्यांनी दिलेल्या मूल्यांवर चालत त्यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.“तुमची उणीव शब्दांत मांडणे कठीण आहे, पण तुमची स्वप्ने आणि विचार पुढे नेण्याचा प्रयत्न कायम राहील,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली.